Civil Defence Volunteers: युवाशक्ती देशाच्या मदतीसाठी सज्ज! नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी मधून करा सेवाकार्य
Civil Defence Volunteers: देशाचे भविष्य आणि आजची ताकद, आपली भारतीय तरुणाई राष्ट्रसेवेच्या कार्यात सक्रिय करण्यासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने, एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ते पाऊल आहे, नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी.
संपूर्ण देशातील तरुणांना ‘माय भारत’ पोर्टलच्या माध्यमातून नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे प्रशिक्षित, सक्षम आणि तत्पर स्वयंसेवकांची एक मोठी सेना तयार करणे आहे. ही सेना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी तत्पर असेल.
नागरी संरक्षण स्वयंसेवक काय करतात?
नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा इतर कोणत्याही संकटकाळात नागरिकांचं संरक्षण करणं आणि त्यांना मदत करणं हे या स्वयंसेवकांकडून अपेक्षित आहे. त्यांच्या कामाची व्याप्ती खालीलप्रमाणे आहे:
- बचावकार्यात मदत करणे
- प्राथमिक उपचार आणि तातडीची वैद्यकीय मदत पुरवणे
- वाहतूक व्यवस्थापन करणे
- गर्दीवर नियंत्रण ठेवणे
- आपत्ती निवारण आणि पुनर्वसन कार्यात मदत करणे
हे सर्व काम अत्यंत जबाबदारीने आणि समर्पण भावनेने करायचं असतं. त्यामुळे या भूमिकेसाठी केवळ इच्छा असून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेण्यासाठीही तयार राहावं लागतं.
आजच्या परिस्थितीत नैसर्गिक संकटं, महामारी आणि अपघात यांसारख्या अनेक समस्यांनी आपल्यासमोर आव्हान उभं केलं आहे. अशा वेळी समाजात एक सक्षम आणि त्वरित प्रतिसाद देणारी यंत्रणा असणं गरजेचं आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक हीच यंत्रणा तयार करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
‘माय भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा हा एक भाग आहे. याचा उद्देश समाजात सामुदायिक सहभागाचं मॉडेल तयार करणं आहे. यातून नागरिकांमध्ये राष्ट्रसेवा, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्परता या मूल्यांची रुजवणूक होते.
या उपक्रमातून युवकांना काय मिळतं?
- देशसेवेचा अभिमान
- रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या कौशल्यांचं प्रशिक्षण
- नेतृत्व क्षमतांचा विकास
- आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याची तयारी
नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी प्रक्रिया:
- सर्वात पहिले अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mybharat.gov.in
- ‘स्वयंसेवक नोंदणी’ हा पर्याय निवडा आणि आवश्यक माहिती भरून सबमिट करा.
देशातील प्रत्येक युवकाने या उपक्रमात सक्रियपणे सहभागी व्हावं. ही केवळ एक सेवा नाही, तर स्वतःला एक जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याची संधी आहे. जर तुम्हीही देशाच्या सेवेसाठी उत्सुक असाल, आपत्तीच्या वेळी मदत करण्याची तयारी दाखवत असाल आणि तुमच्यातील नेतृत्व गुणांना वाढवू इच्छित असाल, तर आजच ‘माय भारत’ पोर्टलवर तुमची नोंदणी करा.