ग्रामीण भागाच्या विकासासाठी, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना आहेत सुरू | Maharashtra Pashu Sanvardhan Scheme
Maharashtra Pashu Sanvardhan Scheme: राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, तसेच पशुपालक आणि शेतकरी बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने अनेक योजना आणल्या आहेत. या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. पशुसंवर्धन विभागाने आता वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी अर्ज मागवले आहेत. जास्तीत जास्त गरजूंना या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभाग सविस्तर माहिती देऊन शेवटच्या घटकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी कार्य करत आहे.
ग्रामीण भागातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्य स्तरावर एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातील आणि लाभार्थ्यांची निवड केली जाईल. याचबरोबर, जिल्हा स्तरावरील विविध योजनांसाठी देखील ही संगणक प्रणाली लागू करण्यात येईल. शासनाने आता अशी पण सोय केली आहे की, एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराला दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही. तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील ५ वर्षांपर्यंत ग्राह्य धरली जाईल. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढेल आणि प्रतीक्षा यादीतील त्यांचा क्रमांक पाहून त्यांना अंदाजे कधी लाभ मिळेल हे सुद्धा कळेल.
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजना (उदा. गाई/म्हशी, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पक्षी वाटप योजना) खालीलप्रमाणे आहेत:
नवीन राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी शेड उभारणीसाठी आर्थिक मदत देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप आणि २५+३ तलंगा गट वाटप इत्यादी योजना आहेत. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या क्षेत्रात अर्ज करायचा आहे, त्याची निवड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती आणि महिलांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
योजनांची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत आम्ही पुढे नमूद केलेल्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. ही संगणक प्रणाली अर्ज भरणे अत्यंत सोपे करते; आणि अर्जामधील बहुतेक माहिती निवडण्याची सोय असल्यामुळे अर्जदाराला कमीतकमी माहिती टाईप करावी लागेल. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच अर्ज भरताना नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबद्दल संदेश पाठवले जातील, त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही परिस्थितीत योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: (सुरुवात: ०३ मे २०२५) ०२ जून २०२५
पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी खालील अधिकृत पोर्टलवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा किंवा पशुसंवर्धन विभागाचे अधिकृत अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन (AH-MAHABMS) डाउनलोड करून ऑनलाईन अर्ज करा.
पशुसंवर्धन विभागाचे अधिकृत पोर्टल:
https://ah.mahabms.com/webui/registration
पशुसंवर्धन विभागाचे अधिकृत ॲप्लिकेशन:
पशुसंवर्धन – AH-MAHABMS (मोबाईल ॲप लवकरच उपलब्ध होईल.)
संपर्क: योजनेसंदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधा. तसेच या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक – १९६२ वर संपर्क साधा. याशिवाय, तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता